मराठीसाठी वेळ काढा

मराठीसाठी वेळ काढा

मराठीत टंकनासाठी इन्स्क्रिप्ट की-बोर्ड शिका -- तो शाळेतल्या पहिलीच्या पहिल्या धड्याइतकाच (म्हणजे अआइई, कखगघचछजझ....या पद्धतीचा ) सोपा आहे. मग तुमच्या घरी कामाला येणारे, शाळेत आठवीच्या पुढे न जाउ शकलेले सर्व, इंग्लिशशिवायच तुमच्याकडून पाच मिनिटांत संगणक-टंकन शिकतील. त्यांचे आशिर्वाद मिळवा.

शुक्रवार, 24 जुलाई 2020

हिम्मत पुरवली पाहिजे -- अपर्णा वेलणकर गांवकरी १९९६


हिम्मत पुरवली पाहिजे !
-अपर्णा वेलणकर
गांवकरी १९९६
बुद्धिमत्ता आणि कर्तबगारीच्या बळावर हिंमतीने वाटचाल करून उच्चस्थानी पोहोचण्याचा आनंद वेगळाच असतो आणि त्यातून मिळणारी आयुष्याची सार्थकता तर दुर्मिळच ! पण अलीकडे वर जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी शॉर्टकटस् सुद्धा बरेच उपलब्ध असतात आणि बहुसंख्य मंडळी डोक्याला फारसा ताप करून न घेता, त्याच ‘राजमार्गा’ वरून जाणं पसंत करतात. अशा ‘शॉर्टकट- राजमार्गावर’ काही जणांनी समारंभपूर्वक पीडित, उपेक्षित, मुकाट्यानं सारं सोसणाऱ्या स्त्रियांची नावं घालून ‘फक्त स्त्रियांसाठी’ असे फलकच लावून टाकले आहेत. जणू द्रौपदीची थाळी........
जे मागाल ते देणारी!’ आता ही थाळी खरी की खोटी? असली की नकली? असे वाद चालू झाले आहेत आणि ते बरेच काळ खमंगपणे चालूही राहतील.
स्त्रियांचा उद्धार करु इच्छिणाऱ्या या गदारोळात मान उंचावून वर पाहण्याची थोडी तसदी घेतली तर? तिथे दिसतो क्षणोक्षणी परीक्षा पाहणारा एक खडतर रस्ता आणि त्यावरून कर्तबगारीने पुढे जाणाऱ्या काही स्त्रियांच्या पावलाचे ठसे.... कर्तृत्वाच्या बळावर मिळवलेला मानसन्मान ... गुणवत्ता सिद्ध करून सार्थ केलेला अधिकार आणि पुरुषांच्या बरोबरीनेचं नव्हेच, त्यांच्याहीपेक्षा वरचं स्थान!
राज्य आणि केन्द्रस्थानातल्या वेगवेगण्या अधिकारपदांवर काम करून स्वतःच्या कर्तृत्वाचा अक्षय ठसा उमटविणाऱ्या लीना मेहेंदळे... याच खडतर रस्त्यावरून अत्युच्च स्थानी पोहोचलेल्या! आज नाशिक विभागाच्या महसूल आयुक्त म्हणून त्यांच्या हाती चार जिल्ह्यांच्या कारभाराची सूत्रे आहेत.
लीनाताईंना भेटायला गेले तेव्हा मनात अनेक प्रश्न होते... आजवरच्या त्यांच्या प्रवासामधल्या खडतर वाटा – वळणं जाणून घेण्याची उत्सुकताही होती!
पण सुरुवात केली ती त्यांनीच... ! म्हणाल्या, “काय चाललंय सध्या नवीन?”
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ‘भूकंपग्रस्त ग्रामपुनर्रचना प्रकल्पा’च्या निमित्ताने मी नुकतीच मराठवाड्यातल्या भूकंपग्रस्त गावात फिरून आले होते. बरंच पाहिलं होतं... आपत्ती पुनर्वसनही! उद्ध्वस्त घरांच्या ढिगाऱ्यापुढे बसलेली माणसे.... मदतीची वाट बघणारी, अजून कोणीतरी येईल.... काही तरी देईल म्हणून देणाऱ्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसलेली! हातपाय शाबूत असलेली पण मनाने पांगळी झालेली असंख्य माणसं आणि त्यांच्या पुनर्वसनाचा ‘सरकारी’ खाक्या.... !
लीनाताई उत्सुकतेनं सारं ऐकून घेत होत्या. बारीकसारीक तपशील विचारीत होत्या. बोलता बोलता म्हणाल्या,
खरं म्हणजे पुनर्वसनाच्या कामात शासकीय पातळीवरून सहभागी होण्याची माझी फार इच्छा होती. मी तसे प्रयत्नही केले होते.” – हे ऐकून थक्क व्हायचीच पाळी आली! शासनाने भूकंपग्रस्त भागात पाठविलेले ऑफिसर्स ऑन स्पेशल ड्युटी मी पाहिले होते. त्यांच्याबद्दल बरंच काही ऐकलं होतं....
लीनाताईंना शिवधनुष्य उचलायचं होतं, मग माशी कुठे शिंकली? तर त्यावेळी लीनाताई केन्द्र शासनाच्या सेवेत होत्या. मी विचारलं, तुम्ही थोडा वेगळा विचार केला असता.
होय, बाहेरून येणाऱ्या मदतीवर जगायची सवय लावणं म्हणजे पुनर्वसन नव्हे. माणसांना मदतीपेक्षा हिंमत द्यावी लागते. “भूकंपात घर पडलं ना, ठीक आहे! तुला लागेल ती मदत मी करीन पण तुझं घर तू बांधायचं,” असा ‘व्ह्यू’ घेतला असता तर या दिशेने प्रयत्न तरी नक्कीच केले असते. ”
पण काही लोक म्हणतात, भूकंपग्रस्तांना हे सांगून आम्ही थकलो. त्यांनी आमचं ऐकलच नाही. ”
माणसं ऐकत नाहीतच, त्यांनी पटवून द्यावं लागतं. सिद्ध करून दाखवाव लागतं. ‘अमूक करू नका’ असं तुम्ही सांगता तेव्हा ‘मग काय करू ?’ या पुढच्या प्रश्नांच उत्तर तुम्हाला द्यावचं लागतं. ”
तुम्हालाही असा प्रश्न अनेकांनी केला असेल?”
हो, सांगली जिल्ह्यातल्या देवदासींनी एकदा मला विचारलं होतं, “मॅडम, आम्ही जोगवा मागायचा नाही तर काय करायचं?”
कधीची गोष्ट आहे?”
मी तेव्हा सांगलीची जिल्हाधिकारी होते. जतजवळच्या एका खेड्यांत दर वर्षातल्या पौष पोर्णिमेला मुलींचा ‘झुलवा’ लावण्याची पद्धत होती. अगदी चार-पाच वर्षाच्या मुली देवाला सोडत. मी चार्ज घेतला आणि लगेचच तो दिवस आला. मी सहकाऱ्यांशी बोलले, माहिती घेतली आणि यावर्षी ही प्रथा चालू द्यायची नाही, असा निर्धार करून सगळ्या तयारीनिशी सांगली सोडली. त्या खेड्यात आदल्या रात्रीच मुक्कामाला गेले. ‘मुलीचं जबरदस्तीनं देवाशी लग्न लावून तिला देवदासी करणे हा कायद्यानं गुन्हा आहे. जे कुणी असा प्रयत्न करील त्याला ताबडतोब अटक होईल’, असं जाहीर केल्यावर त्या गावात चांगलीच खळबळ माजली. आसपासचे दहा-बारा सरपंच व काही प्रतिष्ठित मंडळी ताबडतोब भेटायला आली.
या ‘प्रतिष्ठित’ मंडळींशी चांगलीच खडाजंगी झाली. पण लीनाताईंपुढे त्यांचा टिकाव लागू शकला नाही. लीनाताईंनीच सुरुवात केली.
हे पहा आता काळ बदलला आहे. असल्या वाईट प्रथा तुम्ही स्वतःहून बंद पाडल्या पाहिजेत.”
मॅडम आम्हीही तेच म्हणतो, पण मग देवाची सेवा कोण करणार?” गावकऱ्यांनी सवाल टाकला.
देवाची एवढीच काळजी वाटते ना, मग तुम्हीच त्याची सेवा करा. तरुण मुलींनीच माझी सेवा केली पाहिजे, असं काही देव म्हणत नाही... ”
पण मॅडम, देऊळ झाडायचं-पुसायचं म्हणजे बायकांच कामं” एकजण हळूच म्हणाला.
अस कोणत्या देवानं सांगितलं? उद्या तुम्ही देऊळ झाडायला जाऊन पहा. देव तुमच्या हातातून झाडू काढून घेणार नाही. त्यातूनही बायकांनीच देऊळ झाडावं असं वाटत असेल तर पगार देऊन त्या कामासाठी बायका ठेवा. देवाशी लग्न लावण्याची काय गरज आहे?”
सगळीकडे शांतता पसरली. कोणी काहीच बोलेना. तो प्रसंग आठवत लीनाताई सांगतात “देवाचं काय होईल हा मुद्दा त्यांच्या दृष्टीने गौणच होता. ‘हक्काच्या मुली मिळाल्या नाहीत तर आपलं कसं होईल हीच चिंता.’ शेवटी मी सर्वांना निर्वाणीच सांगून टाकलं, “देवाची सेवा तरुण मुलींनीच केली पाहिजे, असं कोणत्या शास्त्रात लिहिलं आहे, ते मला आणूण दाखवा, नाहीतर या प्रथेमध्ये तुमचा स्वार्थ दडलेला आहे, असा अर्थ काढून मी तुम्हाला अटक करुन तुमच्यावर खटले दाखल करीन. “वर्षानुवर्ष चाललं आहे. मग या वर्षीच का नको?” असली भाषा मला चालणार नाही.”
हे सारं त्या मुलीपर्यंत पोहोचलचं असेल?”
खरा धक्का मला त्या मुलींनीच दिला. त्या दिवशी सकाळी यल्लम्मा देवीच्या देवळातच मी मिटिंग बोलावली होती. वर्षानुवर्षे ज्यांनी ‘देवाची’ आणि गावाची सेवा केली त्या म्हाताऱ्या देवदासी, ज्यांची देवाशी लग्न लागणार होती त्या तरूण मुली, पुजारी, गावकरी सगळ्यांना बोलावलं. प्रत्येक जण मला पुन्हा पुन्हा एकच गोष्ट बजावीत होता “बाई या भानगडीत पडू नका. देवीचा कोप होईल.”
सगळ्यांशी बोलल्यावर एक गोष्ट लक्षात आली की, मुलीचं देवाशी लग्न लागण्यावरच त्या प्रत्येकाचं आयुष्य अवलंबून होतं.
पुजाऱ्याचा हेतू तर उघडच असणार, पण या प्रथेचे चटके ज्यांनी आयुष्यभर सोसले त्या म्हताऱ्या देवदासी तरी तुच्या बाजूने असतील ना ?”
पहिला विरोध तर त्यांचाच होता. पुजाऱ्यांपेक्षाही वरचा सूर लावून त्या भांडत होत्या. तरूण देवदासींच्या लग्नात या बायकांचाच मोठा पुढाकार असतो. नातीगोती संपवून देवाशी लग्न लावलेलं. तारूण्य ओसरल्यावर त्यांच्या हातातोंडाची गाठ कशी पडणार ? नव्या मुली येतात, तेव्हा या जुन्या बायकांच्या म्हातारपणाची आयतीच सोय होते, त्यामुळे नव्य़ा मुलींना ‘सगळे धडे’ देण्याचं काम त्या आनंदाने करतात.
मुलीच्या आईबापांना ‘देवीच्या कोपाची’ भीती असते. ‘खाणारं एक तोंड कमी झालं’ याचा आनंदही नाही म्हटलं तरी असतोच.”
आणि त्या मुली?”
त्यांचं वय अडनिडं असतं की, नेमकं काय चाललं आहे हेच त्यांना समजत नाही. दोन वेळच्या अन्नाला महाग त्या मुलींना जोगवा मागणही आवडतं. पुढे गावातल्या प्रतिष्ठितांशी ‘सबंध’ जुळतात. लग्न करता येत नसल तरी शारीरिक सुख मात्र मिळतं. तरूण वयात हे सारं हवसं वाटतं. पुढे पुढे चटके बसतात, पण तेव्हा त्यांना काहीच करता येत नाही.”
म्हणजे त्याही तुमच्या बाजूने नव्हत्या?”
सुरुवातीला कोणीच नव्हतं. मुली म्हणाल्या, “आमी लगीन लावलं न्हाई, तर आई कोपल.”
मी विचारलं, “तुम्ही देवीला आई म्हणता मग तुमचं वाईट व्हावं असं तुमच्या आईला वाटेल का? आणि समजा आई कोपली तरी ती तुमचं वाईट करील का?”
हे थोड पटतं आहे असं दिसलं. कोणीतरी विचारलं,
बाई, तुमी देव मानता का?”
मी म्हटलं, “ मी आताच मंदिरात जाऊन यल्लम्माआईची पूजा करून आले ना. पण जो लोकांना कोपण्याच्या धमक्या देतो तो देव कसा असू शकेल? मुलीने तिला आवडलेल्या तरूणाशी लग्न करू नये, असं सांगतो तो तरी कसला देव? ते भूतचं म्हटले पाहिजे. अशा देवाला तुम्ही डोक्यावर घेऊन नाचता, ... खरा देव हिम्मत देणारा असतो.”
सगळीकडे शांतता पसरली. थोड्या वेळाने कोपऱ्यातून मुद्याचा प्रश्न आला,
पण मग बाई, आमी पोट कसं भराव?”
मी आनंदाने म्हटलं,
ती जबाबदारी माझी, शरीर न विकता पोट कसं भरायचं हे मी तुम्हाला शिकवीन. पण तुम्हाला काम करावं लागेल. घरी बसून आम्हाला मदत करा म्हणाल तर तुम्हाला एक पैसाही मिळणार नाही.” मीटींग संपली. या सगळ्या सवाल-जबाबामधून एक नवी दिशा मिळाली.
आमी पोट कसं भरावं?” या प्रश्नाचं उत्तर त्या मुलींना हवं होते. ते मिळाल्याखेरीज नुसता कायद्याचा बडगा उगारून काहीच करता आलं नसतं.
लीनाताईंनी काय केलं असेल?
त्या मुलींना मी लगेच सांगितलं. “जतला जाऊन या, तिथं कुक्कुटपालन केन्द्र आहे, ते बघा. मी तुम्हाला ट्रेनिंग द्यायची व्यवस्था करते. ज्यांची तयारी असेल त्यांनी लगेच नावं नोंदवा.” मुली तयार झाल्या. ज्यांना शिवणकाम शिकायचं होत, त्यांच्यासाठी दुसरी बॅच सुरु केली. गडहिंग्लजमध्ये रेशमाचा धागा करण्याचा उद्योग सुरु करता येण्यासारखा होता. काही मुलींना तिकडे पाठवलं. शिकायला येणाऱ्या मुलींना स्टायपेंड देण्याची व्यवस्था केली. चार महिन्यामधेच २५० मुलींच कुक्कुटपालनाचे प्रशिक्षण पूर्णही झालं.”
पुन्हा त्या मुली काम मागायला आल्या असतील?”
या मुली एकदा शिकल्या की, त्यांना काय काम पुरविता येईल, याचा विचार मी आधी पासून करत होते. आय.आर.डी.पी. योजनेमधून लोन मिळवून त्यातून कोंबड्या घेता येतील, पोल्ट्री उभी राहू शकेल. मुली स्वेटर्स बनवू शकतील. या सगळ्या गोष्टींसाठी मार्केटिंग सिस्टीम घालून देता येईल’- अशा अनेक योजना मनाशी होत्या........
आणि अचानक लीनाताईंची बदली झाली. कायद्याने दोषी ठरलेल्या काही शासकीय व्यक्तींना शिक्षा झाली पाहिजे असा आग्रह लीनाताईंनी धरला होता, त्यासाठी मुद्दे-पुरावेही दिले होते.
दोषी व्यक्तींना शिक्षा झाली नाही, पण लीनाताईंची बदली मात्र लगेचच झाली. सांगलीच्या जिल्हाधिकारी म्हणून अत्यंत यशस्वी कारर्कीर्द केलेल्या लीनाताईंना पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाच्या (WMDCच्या) कार्यकारी संचालकपदी पाठविण्यात आलं होतं. एका अर्थी सूडबुद्धीतून देण्यात आलेली ती साइड पोस्टिंग होती.
तुमची काय प्रतिक्रिया होती या निर्णयाबद्दल?”
फार निराश झाले होते. पण असे प्रसंग येणार, याची थोडीफार मानसिक तयारी ठेवावीच लागते. सांगलीचा चार्ज देऊन पुण्याला आले तेव्हा नव्याने सुरु केलेल्या या कामाचं काय होणार याची चिंता होती. पुण्यामध्ये आल्यावर विद्यार्थी सहाय्यक समितीच्या श्री. अच्युतराव आपटे यांना भेटले, त्यांना सगळं सांगतिलं, म्हटलं. “मी आता काही करू शकत नाही, पण हे काम थांबता कामा नये. तुम्ही त्यात लक्ष घाला. वेगवेगळ्या संस्थांच्या मदतीने त्या मुलींना कामाला लावा.”
बोलता बोलता अच्युतराव लीनाताईंना म्हणाले, “दुसरी संस्था शोधता? WMDC मार्फत हे काम होऊ शकणार नाही का?” हा एक वेगळाच विचार त्यांनी दिला होता. वर्तमानात असलेल्या शासकीय पदातून आपण लोककल्याणाचे काम कसे करायचे ती वाट शोधली पाहिजे हा तो धडा होता. (बोलता बोलता लीनाताईंनी सांगितले की त्यांचे वडील व अच्युतराव कॉलेजात एकत्र शिकत होते.)
पुन्हा नव्या उत्साहाने प्रयत्न सुरु झाले. लीनाताईंनी WMDC मध्ये या कामाबद्दल सांगतिलं. आनंदाची गोष्ट म्हणजे WMDC मधील अध्यक्ष व कार्यकारी मंडळ या कामाला पाठिंबा देत होते. शासनाकडे योजना तयार करून पाठविली. शासन म्हणालं, देवदासींच कल्याण करण्याची जबाबदारी समाजकल्याण करण्याची जबाबदारी समाजकल्याण खात्याची आहे, WMDC ने त्यात लक्ष घालू नये.
ग्रामीण उद्योगधंद्यांचा विकास’ WMDC च्या अखत्यारीत येतो. मग या नावाखाली पुन्हा नवी योजना आखली. शासनाचे उत्तर आले, ते “R.D.D चं काम आहे, तुमचं नाही.”
शासनाने मंजुरी नाकारली, पण लीनाताईंनी आपल्या अधिकारात जेवढी मदत पुरविता येईल तेवढी पुरवायची असं ठरवलं. त्याप्रमाणे काम सुरु झालं. लीनाताईंनी आपल्या चेअरमनना आणि मव्या सहकाऱ्यांना या कामाचं महत्व आणि वेगळेपण पटवून दिलं होतंच. प्रत्येकाने कामात सहभागी व्हायची तयारी दाखविली.
गडहिंग्लजमध्ये एक देवदासी आर्थिक पुनर्वसन केन्द्र उघडून तिथे या मुलींना हळूहळू कामाला लावायचं ठरवलं. त्यांना सांगितल, लोकर खरेदी करणं, स्वेटर्स विकणं हेही आता तुमचे काम आहे. तुम्ही पुढे शिका. मुलींनी पुन्हा एक धक्का दिला. त्या म्हणाल्या, ‘ही कटकट आम्ही करणार नाही. आम्ही फक्त स्वेटर विणून तयार करू. त्यांचे पैसे मिळवून द्या.”
पुढे तर अगदी ‘संप करु’ इथंपर्यंत मजल गेली. एखादा असता तर हात झटकून मोकळा झाला असता. लीनाताईंनी काय केलं? त्या सांगतात....
थोडा विचार केल्यावर लक्षात आलं की, त्यांच्या मनाची तयारी असून झालेली नाही. केल्या कामाचे पैसे मागणं, नाही मिळाले तर संपाची भाषा करणं वेगळं आणि स्वतःच्या आयुष्याचा आर्थिक पाया घालणं वेगळं. त्या मुलींनी कुणाच्याही मदतीशिवाय स्वतःच्या हिंमतीवर उभं रहावं, अशी माझी इच्छा होती. पण ते त्यांच्या मनाला पटणंही गरजेचं होतं. ही जाणीव व्यक्तिमत्व विकासातून येते. म्हणून या मुलींसाठी ‘व्यक्तिमत्व विकास शिबिर’ घ्यावं असं ठरवलं, त्यासाठी शासनाकडे पैसे मागितले.”
मिळाले का?”
शासनाने मला कळवलं, ‘असल्या प्रकारांसाठी शासनाकडं पैसा नाही’. मी म्हटलं नसू दे! WMDC तर्फे खर्च करायचा असं ठरवलं. कोल्हापूरहून प्राचार्या लीलाताई पाटील यांची मदत घेतली. पुण्याहून निर्मलाताई पुरंदरे आल्या. पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांकडून अवचित मदत मिळाली. विद्यापीठाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि शिक्षक सहभागी झाले. गडहिंग्लज ला ५-७ शिबिरं झाली. विद्यार्थ्यांनी तर राखी पोर्णिमेला या मुलींकडून राखी बांधून घेतली. लीलाताई, निर्मलाताईंशी मुली मोकळ्यापणाने बोलल्या आणि सगळ वातावरण बदलून गेलं. इतक की पुढे लगेचच केंद्र शासनाच्या महिला बाल कल्याण विभागाने या प्रकल्पासाठी भरीव मदत केली.
तुम्ही इतरत्र गेल्यानंतर त्या मुलींचा तुमच्याशी पूर्वीइतका संपर्क राहिला नसेल?”
माझ्यापेक्षाही शहराशी त्याचा संपर्क येण्याची गरज होती म्हणून आम्ही त्यांना ग्रुप ग्रुपने पुण्यात, मुंबईला आणि दिल्लीत नेले. त्या स्वतंत्रपणे पुण्यात फिरू लागल्या, मग त्यांना पुण्यातली लोकरीची दुकानं दाखविली. मोल-भाव कसा करायचा, डीलरकडून माहिती कशी मागवायची, पैशाचे व्यवहार कसे करायचे ते शिकवलं. पैसे मिळवायचे तर लिहिता-वाचता येण किती महत्वाचं आहे हे आपोआपच त्यांच्या लक्षात आलं. त्या मुली लांबच्या गावांतून गडहिंग्लजला येत. लीनाताईंनी त्यांना सुचवलं “तुम्ही सायकल का शिकत नाही?” सात-आठ जणी हौसेने सायकल शिकल्या. कर्जाचे हप्ते ठरवून सायकल खरेदी करायलाही लीनाताईंनी मदत केली.
मुलींना सायकली मिळाल्या आणि त्याहीपेक्षा मोठा आत्मविश्वासही! पुढच्या मिटींगमध्ये मुली म्हणाल्या “तुम्ही आम्हाला जीप पण घेऊन दिली तर आम्ही जीप शिकू.”
एव्हाना या कामाला स्वतःची गती मिळाली होती. सुरुवातीच्या काळात गडहिंग्लच्य़ा शाळेने दिलेल्या एका जागेत मुली काम करत. लीनाताईंनी आर.सी.एफ. शी संपर्क साधला. इमारत बांधण्यासाठी ग्रँट मागितली. कोल्हापूरच्या जिल्ह्याधिकाऱ्यांकडून इमारतीसाठी जमीन देण्याचं आश्वासनं घेतलं.
लीनाताई सांगतात, “काम त्यांचं त्यांनीच करावं असा माझा हट्टच होता. मी फक्त मुलींना सांगतिलं, जमीन हवी ना इमारतीसाठी? तुम्ही स्वतः अर्ज करा. मी फक्त फॉलोअप करीन.”
दिल्लीत IITF तर्फे दरवर्षी औद्योगिक प्रदर्शन भरतं. त्यात WMDC चा एक स्टॉल असतो. गडहिंग्लजहून मुलींना बोलावलं. एवढ्या मोठ्या प्रदर्शनात त्यांनी स्वतः स्वेटर्स विकले. सुरुवातीला रंगांची माहितीही नसणाऱ्या मुली, आता शेडस् बद्दल, कॉम्बीनेशन आणि डिझाईनबद्दलही मोकळेपणाने बोलू लागल्या. गिऱ्हाईकाला कुणाला काय चांगलं दिसेल ते सांगू लागल्या. आम्हाला हिंदी शिकवा असा आग्रह धरू लागल्या. थोडक्यात काय तर पुनर्वसन ही काय एका रात्रीत घडू शकणारी बाब नाही. भूकंप आला, तर एका रात्रीत सर्व उद्ध्वस्त होतं. देवाशी लग्न लावलं तर एका क्षणांत जीवनाची दिशा पालटते. पण स्वतःच्या पायावर उभ रहा म्हटलं तर चिकाटीने बराच काळ प्रयत्न सुरु ठेवावे लागतात. त्यांनी विचारांची जोड द्यावी लागते. एका तऱ्हेने प्रश्न सुटत नसेल तर वेगळ्या तऱ्हेने सोडवावा लागतो. सातत्य लागत. मुळांत धीर खचलेल्यांना हिम्मत पुरवावी लागते. तरच पुनर्वसन होऊ शकत. सरकारी मदत म्हणजे हिम्मत नाही, ती संवादातून व चिकाटीतून येते. ती पुरवायची म्हटली तर हे काम सरकारी नसून आपण आपल्याच लोकांसाठी करत आहोत ही भावना सातत्याने ठेवावी लागते.
----------------------xxx----------------------